संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : टोळ्यांच्या सूडात शहरातील रस्ते रंक्तरंजित होत असताना पुण्याच्या गुन्हेगारीचा नवा चेहरा बनलेल्या ‘अल्पवयीन’ मुलांकडून देखील या रक्तरंजित खेळात भर घातली जात असून, जुन्या वादविवादातून हे रस्त्यांवर रक्तांचा सडा पाडू लागले आहेत. गेल्या काही वर्षांमधील गुन्ह्यांमधील अल्पवयीन मुलांची आकडेवारी पाहिल्यानंतर पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झाला की काय अशी स्थिती दिसत आहे. गेल्या पाच वर्षात १४०० गुन्ह्यांत जवळपास २२४४ मुलांवर गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांच्या गुन्हेगारीमुळे पोलिस देखील हतबल झाले आहेत.
कोंढव्यातील खून आणि दुसऱ्याच दिवशी घडलेल्या बाजीराव रस्त्यावरील खूनानंतर अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ‘विद्येचं माहेरघर’ म्हणणाऱ्या पुण्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीचा चेहरा बदलताना दिसत आहे. शिक्षणाचं वय असलेली अनेक मुलं गुंडगिरी अन् भाईगिरीकडे वळली आहेत. त्यांच्या स्वत:च्याही टोळ्या झाल्या आहेत. तर, अनेकजन हे टोळक्यांमध्ये भरती होऊन गुन्हेगारीकडे वळले आहेत. या मुलांना एखाद्याला मारणं म्हणजे, स्टेट्स निर्माण झाल आहे. हे मारमारीनंतर रिल्स बनवून त्याच उद्दात्तीकरण देखील करत असल्याचे दिसत आहे. एकमेकांना पाहून घेण्याची व ताकद दाखविण्याची भाषा खुलेआम सुरू असते. पिस्तूल दाखविणे, हातात हत्यार घेऊन व्हिडीओ काढणे, त्यावर भाईगिरीची टॅग लावणे या मुलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. परिसरात नाव कमावण्यासाठी, ‘भाई’ बनण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी कोयते घेऊन फिरणाऱ्या या अल्पवयीनामुळे मात्र पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
गुन्हेगारीचा नवा पॅटर्न
आकडेवारी सांगते काय?
गेल्या पाच वर्षांतील पोलिस आकडेवारी
| वर्ष | गुन्ह्यांची संख्या | आरोपींची संख्या |
|---|---|---|
| २०२१ | ३३६ | ५१९ |
| २०२२ | ३४२ | ५४४ |
| २०२३ | २९३ | ४३५ |
| २०२४ | ३०३ | ५१४ |
| २०२५ (ऑक्टोबरपर्यंत) | १४९ | २३२ |
कायदा आणि कारवाई
अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुलांवर बालगुन्हेगार न्याय कायदा २०१५ अंतर्गत कारवाई होते. शिक्षेची व दंडाची तरतूद असली तरी या सौम्य कायद्याचा काही ठिकाणी गैरवापर केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मे २०२४ मध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अल्पवयीन टोळ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र वाढत्या घटनांनी हा उपायही पुरेसा ठरत नाहीय.
सोशल मीडियावर फॉलोअर्स
कोंढव्यात वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला म्हणून घडलेल्या सागर काळे खून प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाची माहिती पोलिसांनी काढली असता या मुलाचे सोशल मिडीयावर प्रचंड फॉलोअर्स असल्याचे दिसून आले आहे. लाखांत त्याचे फॉलोअर्स असल्याचे सांगण्यात आले. या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच हे मुल भाईगिरीच्या मोहात पडत असल्याचेही एक निरीक्षण आहे.






