संग्रहित फोटोे
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हातउसने दिलेल्या पैशांवरून वाद झाल्यानंतर केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी पेठेतील राजेंद्रनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वसाहतीत ही घटना घडली आहे. तरुणाच्या खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. एसआरए वसाहत, राजेंद्रनगर, नवी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मन्या सोनावणे (रा. राजेंद्रनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आनंद डोलारेची आई वनिता (वय ५७) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद याला दारुचे व्यसन आहे. ५ जानेवारी रोजी तो कामावरुन रात्री घरी आला. दारु पिऊन तो वसाहतीच्या परिसरात थांबला होता. आरोपी मन्याने आनंदला हातउसने पैसे दिले होते. त्याने आरोपीला पैसे दिले नव्हते. त्यामुळे तो त्याच्यावर चिडला होता. घटनेच्या दिवशी रात्री आनंद वसाहतीत थांबला होता. त्यावेळी मन्या तेथे आला. हातउसने दिलेल्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला.
आनंदला दांडक्याने मारहाण केली. आरोपीने आनंदला उचलटून जमिनीवर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या आनंदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खून केल्याप्रकरणी आरोपी मन्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कृषी आयु्क्तालयातील उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात; अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.