फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे भावांमधील वादातून खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी लहान भावाला अटक केली आहे. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सुटाळा येथील नागोबा मंदिराजवळ राहणारे देविदास महादेव गायकी यांनी गुरुवारी त्यांच्या एका मित्राला घरी आणले होते. देविदास आणि त्यांचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. घरातील परिस्थिती पाहून देविदासचा लहान भाऊ मंगेश गायकी याने त्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. मात्र यावरून दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच तीव्र भांडणात बदलला.
या वादादरम्यान देविदास यांनी मंगेशच्या डोक्यावर काठीने मारून त्याला जखमी केले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या मंगेशने घरातून चाकू आणला आणि देविदासवर हल्ला केला. त्याने देविदासच्या डाव्या कुशीत तसेच पोटात चाकूने वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची तक्रार मृत देविदास आणि आरोपी मंगेश यांची आई लिलाबाई महादेव गायकी यांनी पोलिसांकडे दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी मंगेश गायकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१४) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, खामगाव तालुक्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. गेल्या आठवड्यात राहुळ या गावात प्रेमप्रकरणातून सख्ख्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा अजूनही सुरू असतानाच आता सुटाळा येथे पुन्हा भावाकडून भावाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
या सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वाद, मद्यप्राशन आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.






