बनावट संस्थांच्या माध्यमातून फसवणूक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२४ मध्ये एनबीएफसीसाठी जारी केलेल्या फसवणूक जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बनावट सोशल मीडिया खाती, व्हॉट्सअॅप गट, बनावट आर्थिक संस्था आणि त्यांच्या संकेतस्थळांद्वारे कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यानी नागरिकांना “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” असा संदेश देत अज्ञात लिंक, कॉल किया संदेशांची खातरजमा केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन केले.
तत्काळ तक्रार हेच सायबर गुन्ह्यांविरुद्धचे प्रभावी शस्त्र
नागरिकांशी संवाद साधताना सायबर फसवणूक ही वाढती सामाजिक समस्या आहे. निष्काळजीपणे वैयक्तिक माहिती शेअर केल्यास ती गुन्हेगारांच्या हातात जाते. फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या ६० मिनिटांना ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते आणि या काळात तक्रार नोंदवल्यास सुमारे ९० टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता असते ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता ही संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असून ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांतून सातत्याने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जात असल्याचे बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींनी सांगितले.
डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी आणि तत्काळ तक्रार नोंदविणे हेच सायबर गुन्ह्यांविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला हेड कॉन्स्टेबल खाडे, दीपक ठोंबरे, अमोल एष्टके, निवृत्त उपअधीक्षक भारत काकडे यांसह सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.






