FOOD POISIONING(फोटो सौजन्य - PINTEREST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून जवळपास ६०० लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला असून १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात घडली आहे. विषबाधेचे नेमके कोणते कारण अजून स्पष्ट झाले नाही आहे.
Crime News: सांगवी पोलिसांची मोठी कारवाई! दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी थेट…
नेमकं काय घडलं?
अंबाळा ठाकूरवाडी गावात शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा दुपारी ४:३० वाजता पार पडला. या सोहळ्याला अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर 32 ठाकरवाड्यातील वऱ्हाडी या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरु झाल्या. यात सर्वांनी जेवण केले आणि घरी परतले.
दुसऱ्या दिवशी (२६ एप्रिल) या सर्वानाच उलट्या, जुलाब,चक्कर येणे, पोटदुखी होऊ लागली. याविषबाधेमुळे सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या बालकाचा मृत्यू झाला आहे. संगीत मेंगाळ (वय २५, रा. अंबाळा) या महिलेसह १७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर कुरणखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी घटनास्थळी दाखल
सामूहिक लग्न सोहळ्यातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर घटनास्थळी पोहचले. तसेच उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, विषबाधेचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेण्यात येणार आहे.