पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार;
पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना अडवून आम्ही फायनान्स कंपनीचे आहोत, तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत, असे सांगत त्यांना धमकवत मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असून, यवत आणि पाटस पोलिसांनी अशा टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
२२ फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस टोलनाक्याजवळ पासून ते यवत गावच्या दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कारसमोर गाडी थांबवली. त्यातील प्रवाशांना दमबाजी आणि मारहाण करत त्यांची लूटमार केल्याची घटना घडली. याप्रकरणी अक्षय भाऊसाहेब सानप (वय 30 रा. फातिमा नगर, पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकारामुळे सध्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार घडल्यानंतर अद्यापपर्यंत अनोळखी तरुणांना पोलिसांना पकडण्यात अपयश आले आहे.
दरम्यान, हा प्रकार गंभीर असून, असे प्रकार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सातत्याने घडत आहे. फायनान्स कंपनीचे नाव सांगून गुन्हेगारी प्रवृत्तीची टोळी सक्रिय आहे. वाहन तालुक्याला हेरून त्यांची गाडी आणून त्यांना धमकावून लूटमार करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या टोळीला काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या सहकार्य आहे का? असा प्रश्न सध्या वाहन चालकाकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने लक्षात घेऊन संबंधित टोळीला जेरबंद करून खंडणीसारखे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी वाहन चालकाकडून होत आहे.
प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या या प्रकाराला आळा बसण्याची गरज आहे. अशी अपेक्षा वाहन चालक आणि प्रवासी करीत असून, या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लक्ष्य घालावे, अशी मागणीही प्रवासी आणि वाहन चालकाकडून होत आहे.
हेदेखील वाचा : Chhattisgarh Crime: झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने सपासप वार; तिघांचा मृत्यू तर…






