सौजन्य - नवराष्ट्र टीम
प्रशांत सत्यवान साठे, कुमार पांडुरंग परबळ (दोघेही रा. भोंगवली, ता. भोर) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारी रोजी सदर आरोपींनी पुरंदरच्या मांढर टोणपेवाडी व शिंदेवाडी वन विभागाच्या हद्दीत प्रवेश करून परिसरात आग लावून दिली. तसेच आग लावल्यानंतर तेथेच उभे राहून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात होते. याबाबत स्थानिक वनकर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याच्यावर प्रतिहल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन कर्मचाऱ्यांनी शिफातीने ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली.
सदरची कारवाई पुण्याचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक आणि सासवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिंचे वनपाल आर बी रासकर, मांढरच्या वनरक्षक श्रीमती एसव्ही साठे, पांगारे वनरक्षक जी व्ही तांबे, नारायणपूर वनरक्षक वय एस नजन, आंबळेचे वनरक्षक व्ही टी खरात, जेजुरीचे वनरक्षक डी देवकर, देवडीचे वनरक्षक ए एम लव्हाळे, वन कर्मचारी किशोर कुंभारकर यांच्या पथकाने केली. संबंधित आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब, २६ (१) क, ५२ (२) त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ९ (१) (क), ९ (१) (ब), वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ चे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ असून, वनांचे मोठे प्रमाण आहे. या वनात हजारो लहान मोठे कीटक, प्राणी, पशुपक्षी यांचे वास्तव्य आहे. तसेच शेकडो वेगवेगळ्या वनस्पती औषधी वनस्पती आणि जंगली झाडे आहेत. डोंगरी परिसारत गवत मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांसाठी चाराही उपलब्ध होतो. दरवर्षी उन्हाळा सुरु होताच समाजकंटक वनांना आगी लावून वनसंपत्ती नष्ट करतात. परिणामी निसर्गाचे प्रचंड नुकसान होते. आजपर्यंत गुन्हेगार सापडत नसल्याने वनांना आगी लागण्याचे कारण स्पष्ट होत नव्हते. मांढर टोणपेवाडी परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आगी लावल्याचे उघडकीस आले असून, दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनांना आगी लावल्यास एक वर्षांचा कारावास
वनक्षेत्रास वणवा लावणे हा भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा आहे. यानुसार एक वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे. त्यामुळे वनांना आगी लावू नयेत अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे एखाद्या भागात आग लागल्याचे दिसून आल्यास स्थानिक वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी आणि ग्रामस्थांनी वणवा विझविण्यास मदत करून वनसंपदेचे संरक्षण करावे असे आवाहन सागर ढोले यांनी केले आहे.






