Washim District Courtचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांपूर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप
Washim District Court News: वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल ९ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण ९ मे २०११ रोजी घडले होते. रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी (ठाणेदार) महादेव माणिक धाडे आणि त्यांच्या इतर ८ कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या वाढोणा येथील पारधी वस्तीवर छापा टाकला होता. एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी बेग्या पवार या तरुणाला ताब्यात घेतले होते. चोरीचा गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी बेग्याला पोलिस कोठडीत बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १० मे २०११ रोजी बेग्या पवारचा कोठडीतच मृत्यू झाला.
या मृत्यूमुळे निर्माण झालेला तणाव पाहता शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला होता, सीआयडीच्या पथकाने ३४ दिवस सखोल तपास करून दोषी पोलिसांवर खुनाच्या गुन्ह्यासह विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. अखेर तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ कायदेशीर कालावधीनंतर पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
मृत बेग्या पवार याच्या आईने निकालानंतर भावूक होत प्रतिक्रिया दिली. माझ्या मुलावर यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता किंवा त्याने साधा कोणताही गुन्हा केला नव्हता, केवळ तो ‘पारधी’ समाजाचा असल्याच्या पूर्वग्रहातून पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचा जीव घेतला, अस सांगत त्यांनी टाहो फोडला. न्याय मिळाल्यानंतर बेग्याच्या वृद्ध आई-वडिलांनी समाधान व्यक्त करत सीआयडी आणि सरकारी वकिलांचे आभार मानले,.
या प्रकरणात पीडित कुटुंबाची बाजू मांडणारे सरकारी वकील श्रीराम काळ यांनी सांगितले की, हा निकाल अत्यंत ऐतिहासिक आणि कायद्याचे राज्य असल्याचे सिद्ध करणारा आहे.
‘ते’ ९ पोलिस अधिकारी
महादेव माणिक धांडे (तात्कालीन ठाणेदार)
मदन केशव पवार
शिवाजी नामदेव खिल्लारी
पंजाब माणिकराव पाटकर
रमेश सीताराम पवार
प्रकाश हिरालाल तारम
नागोराव भगवान खांडके
अशोक निवृत्ती वैद्य
बसंत कणिरान






