फोटो सौजन्य - Social Media
काय केलं पोस्ट?
सलील कुलकर्णी यांनी केलेल्या पोस्टमध्ये सुप्रसिद्ध मराठी कवियत्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांच्या कवितेचा फोटो आहे. या सुंदर ओळी स्वतः शांताबाईंनी लिहल्या आहेत. त्या कशा लिहल्या गेल्या? याची संपूर्ण माहिती स्वतः सलील यांनी पोस्टखाली कॅप्शन देत सांगितली आहे.
त्यांनी नमूद केले आहे की, “१९९८ साली ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांनी मला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेल्या गाण्याचा हा कागद नुकताच पुन्हा सापडला. काहीतरी वेगळे शोधताना जुन्या फाईलमधील जपून ठेवलेल्या कागदांमध्ये तो अचानक समोर आला आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. आजच्या काळात आपण PDF, इमेज किंवा टाइप केलेला मजकूर सहज पाठवतो; पण अशा हस्तलिखित कागदाचा स्पर्श म्हणजे त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श पुन्हा अनुभवण्यासारखा वाटतो. सातारा रोडवरील त्यांच्या घरी त्यांना अनेकदा निवांत भेटण्याचा योग आला होता. एकदा तर त्या आमच्या घरी विकेंडसाठीही राहायला आल्या होत्या. त्यांच्याच एका भेटीत त्यांनी माझी ओळख अरुणा ढेरे यांच्याशी करून दिली होती. विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर मी केलेली बालगीतेही त्यांनी आवर्जून ऐकली होती. शांताबाई कधीच ‘महान कवयित्री’ किंवा ‘प्रसिद्ध गीतकार’ या भूमिकेत वावरल्या नाहीत. त्या नेहमी एका बुद्धिमान, निरागस आणि प्रेमळ आजीसारख्याच भेटायच्या. मात्र लेखणी हातात घेताच जणू सरस्वतीच अवतरायची. त्यामुळे त्या वेळी अवघ्या पंचविशीत असलेल्या माझ्यावर त्यांचे नातवासारखे प्रेम होते. त्या प्रसिद्धीच्या उंच शिड्या उतरून लहानांशी गप्पा मारण्यासाठी सहज खाली यायच्या आणि म्हणूनच त्या अधिक मोठ्या वाटायच्या. एकदा मी त्यांना भेटायला जाताना बटाटेवडे घेऊन गेलो होतो. गप्पा मारताना बालगीतांचा विषय निघाला. मी संकोचत विचारले, “तुमच्या पुस्तकातील एखादी कविता पुढच्या कॅसेटसाठी घेऊ का?” त्यावर त्या क्षणाचाही विलंब न करता म्हणाल्या, “अरे, मी अजून जिवंत आहे ना! नवीन लिहिते की!” मी अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांनी हसत मला वडा घेण्यास सांगितले. मी म्हणालो, “उद्या कार्यक्रम आहे, मी नाही खात.” त्या काळी आवाज जपणे म्हणजेच गाणे जपणे असे वाटायचे. माझे उत्तर ऐकताच त्या म्हणाल्या, “असं? यावरच एक गाणं लिहिते. मुलांना नक्की आवडेल!” आणि पुढच्या अवघ्या पंधरा मिनिटांत हा कागद माझ्या हातात होता. शब्दांवर कोणतीही ओढाताण नव्हती, यमकांसाठी धडपड नव्हती. त्या शब्द शोधत नसत, त्या शब्द निवडत असत. आजही शांताबाई शेळके आणि सुधीर मोघे खूप आठवतात. तो साधा, निरागस आणि माणुसकीने भरलेला काळ खूप आठवतो. हा कागद हातात घेतला की वाटते, जणू शांताबाईंनी पुन्हा एकदा प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आहे. – सलील कुलकर्णी”
शांताबाई शेळकेंची ती कविता :
कोकीळ म्हणते ‘काय करावे’?
खोकून बसला पार घसा,
कुहूकुहूचे सुंदर गाणे,
सांगा आता गाऊ कसा?
कुत्रा म्हणतो ‘उडी मारुनी,
पकडू गेलो एक ससा’
ससा पळाला, पाय मोडला,
चोरामागे धावू कसा!
म्हणे कोंबडा TV बघता,
रात्री गेला वेळ असा
उशिरा उठलो, कुकडुकुची
हाक कुणा मी देऊ कसा?
बोका म्हणतो ‘चष्म्यावाचून
आंधळाच मी भर दिवसा’,
बिळात सर्रकन पळून गेला
उंदीर कोठे, मी पाहू कसा?
– शांताबाई शेळके






