(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खुप कमी वेळात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.
या अद्भूत विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे. सावित्री आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणार आहे. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक व भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रितीरिवाजांचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
परंपरा, संस्कार आणि भावनांनी नटलेला हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा ठरणार आहे. हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल यात शंका नाही.
स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही सामाजिक इतिहासावर आधारित नाटक आहे. ही मालिका सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या शिक्षणाच्या कार्याची आणि समाज सुधाराच्या प्रवासाची कथा सांगते.
मालिकेत सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांची वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील घटनांवर प्रकाश टाकला जातो. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, महिलांच्या शिक्षणाचा अधिकार, सामाजिक समानता आणि अन्यायाविरुद्ध लढा हे मालिकेचे मुख्य मुद्दे आहेत.






