राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा शेवटचा दिवस; तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते पटनात दाखल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या मतदार अधिकार यात्रा आज (१ सष्टेंबर) बिहारची राजधानी पटना येथे संपत आहे. पटनातील गांधी मैदानात होणाऱ्या पदयात्रेसाठी राहुल गांधी विमानतळावरून निघाले, परंतु गांधी मैदानाच्या १ किमी आधीच त्यांचा ताफा जाममध्ये अडकला. पदयात्रेमुळे सध्या आर ब्लॉक ते जीपीओ गोलंबरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर जाम दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा पटनातील उच्च न्यायालयात असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ ४ किमी अंतरावर संपेल. या पदयात्रेला ‘गांधी से आंबेडकर’ असे नाव देण्यात आले आहे. राहुल गांधी दिल्लीहून पटनात दाखल झाले. त्यानंतर ते गांधी मैदानाकडे निघाले आहेत. दरम्यान, तेजस्वी त्यांच्या निवासस्थानावरून गांधी मैदानाकडे जात आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘लोकशाही आणि संविधान नष्ट करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल.’
“शरद पवारांना हे उशीरा सुचलेलं शहाणपण…; मराठा आरक्षणावरुन जयकुमार गोरे यांनी लगावला टोला
कार्यकर्त्यांसह गांधी मैदानात जाणारे सीपीआय(एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य म्हणाले, ‘आज यात्रेचा शेवट आहे, पण तो फक्त एक थांबा आहे. मतदारांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहील.’ त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल, रेवंत रेड्डी, अशोक गेहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार तसेच आय.एन.डी.आय. आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मोठे नेते आजच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पदयात्रेसाठी गांधी मैदानात एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. गांधी मैदानात महाआघाडीतील पक्षांच्या सुमारे २० हजार कार्यकर्त्यांची गर्दी आहे.
महाआघाडीची मतदान हक्क यात्रा आज (१ सप्टेंबर) पटना येथे अंतिम टप्प्यात पोहोचली. या यात्रेला सकाळी १०:५० वाजता गांधी मैदान गेट क्रमांक १ पासून सुरुवात झाली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर नेत्यांनी एसपी वर्मा रोड, डाक बंगला चौक, कोतवाली पोलिस स्टेशन, आयकर गोलंबर, नेहरू पथ मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ प्रस्थान केले. गांधी मैदानात बांधलेल्या मुख्य स्टेज आणि पंडालमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून येथून महाआघाडीचे नेते जनतेला संबोधित करतील. डाक बंगला चौकाजवळही स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले असून तेथेही सभा होण्याची शक्यता आहे.
ही यात्रा १७ ऑगस्ट रोजी सासारामच्या बायडा मैदानातून सुरू झाली होती. तब्बल २३ जिल्ह्यांतून प्रवास करत ती आज पटना येथे पोहोचली आहे. प्रवासादरम्यान ३ दिवसांचा ब्रेक घेण्यात आला होता. यात्रेच्या उद्घाटनाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. त्यानंतर प्रियंका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांसह इंडिया आघाडीचे अनेक प्रमुख नेते यात्रेत सहभागी झाले.
महाआघाडीच्या मतदार हक्क यात्रेच्या समारोपावेळी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव म्हणाले की, “एक गोष्ट स्पष्ट आहे की, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता संपली आहे आणि भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे. यावेळी जनता भाजपला बिहारमधून हाकलून लावण्यासाठी काम करेल आणि हा संदेश संपूर्ण देशात पोहोचेल. लोकशाही आणि संविधान नष्ट करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल. या संपूर्ण प्रवासात एक मोठा जनसमुदाय आमच्यासोबत उभा राहिला. आम्हाला बिहारच्या जनतेचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळाला आहे. आम्ही सर्व जनतेचे आभारी आहोत.”
काँग्रेसच्या मते, मतदार हक्क यात्रेचा मुख्य उद्देश मतदार यादीतून नावे वगळण्याच्या कथित घटनांवर प्रकाश टाकणे हा होता.
-निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे
-राष्ट्रीय व्यासपीठावर मत चोरीचे आरोप उपस्थित करणे
-नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे
राहुल गांधी आणि काँग्रेसने आरोप केला की, निवडणूक आयोगाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे लाखो वैध मतदारांची नावे वगळली जात आहेत. या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, त्यानंतर ६५ लाख नावांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी १३०० किमी अंतर कापले. १५ दिवसांच्या या यात्रेत बिहारमधील २५ हून अधिक जिल्हे समाविष्ट होते. यामध्ये सासाराम, सुपौल, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, नवादा, औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यांचा समावेश होता. यात्रेदरम्यान सार्वजनिक सभा, पथसंचलन आणि नागरिक संवाद आयोजित करण्यात आले. लखीसराय आणि औरंगाबादमध्येही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.