देशात मोठं जलसंकट येणार; 166 जलाशयांची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, 'या' राज्यांना सर्वाधिक फटका...(फोटो - प्रातिनिधीक)
नवी दिल्ली : देशात आता प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. असे असतानाच देशातील जलसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस खाली येताना दिसत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने संकटाची चिन्हे अधिक स्पष्ट झाली आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, १६६ प्रमुख जलाशयांमधील उपलब्ध पाणी त्यांच्या एकूण क्षमतेच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.
देशातील अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याच्या पातळीतही घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे प्रादेशिक जलसंतुलन बिघडण्याची चिंता वाढली आहे. देशातील १६६ जलाशयांमधील एकूण जिवंत साठा ७१.०८२ अब्ज घनमीटर (बीसीएम) पर्यंत खाली आला आहे, जो त्यांच्या १८३.५६५ बीसीएमच्या एकूण क्षमतेच्या केवळ ३८.७२ टक्के आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी ही पातळी ४४.७१ टक्के होती, जी केवळ तीन आठवड्यांत झालेली एक लक्षणीय घट आहे. या १६६ जलाशयांमध्ये देशाच्या २५७८१२ अब्ज घनमीटर (बीसीएम) एकूण अंदाजित जलसाठा क्षमतेपैकी अंदाजे ७१.२० टक्के पाणीसाठा आहे. यापैकी २० जलाशय जलविद्युत प्रकल्पांशी जोडलेले असून, त्यांची एकत्रित क्षमता ३५२९९ बीसीएम आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या मते, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. गंगा खोऱ्यातील पाण्याची पातळी ५३.८% वरून अंदाजे ५०.०१% पर्यंत घसरली आहे. गोदावरी नदीतील पाण्याची पातळी ४७.५८% वरून ४०.६९% पर्यंत, तर नर्मदा नदीतील पाण्याची पातळी ४६.०९% वरून ३८.८२% पर्यंत घसरली आहे.






