मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बैठक
मत्स्यसंपदा योजनेमध्ये किनारी गावांचा विकास केला जाणार
भविष्यात विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित
मुंबई: मुंबई महानगर प्रदेशात (MMRDA) विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा ‘हाऊसिंग स्टॉक’मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासाची कामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा. विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची आवश्यकता आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत येथील जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा करावा. दिघी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. मुंबई महापालिकेने शताब्दी आणि भगवती रुग्णालयामध्ये दर्जेदार रुग्णसेवेसाठी आधुनिक यंत्र सामुग्री, स्वच्छता आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी दिले.
मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी. गोराई भागात दिल्ली येथील भारत मंडपम च्या धर्तीवर ‘ कन्व्हेंन्शन सेंटर’ निर्माण करण्याकरिता कार्यवाही करावी. यासाठी बृहत नियोजन आराखडा बनवावा. या केंद्राचा उपयोग व्यावसायिक स्तरावर होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
“महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल…”; काय म्हणाले Devendra Fadnavis?
मत्स्यसंपदा योजनेमध्ये किनारी गावांचा विकास करण्यात यावा. मासेमारीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या राहत असलेल्या नागरिकांकरिता मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. या सुविधेचा पर्यटकांसाठीसुद्धा लाभ होऊ शकतो, असेही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.






