सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख; PM मोदी कडाडले
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी, राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. त्यावर टीकेची झोड उठली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला असून माफीची मागणी केली आहे. राष्ट्रपती कार्यालयातूनही सोनिया गांधींचं विधान अस्वीकार्य आहे, असं सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषणावेळी थकल्या होत्या असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. त्यावर आता भाजपनं टीकास्त्र सोडलं आहे. सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या वक्तव्याने सर्व मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य खरंतर टाळता आलं असतं. राष्ट्रपती भवनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना ‘पुअर लेडी’ असं संबोधलं. भाषणावेळी त्या खूपच थकलेल्या दिसल्या. बोलताना त्या अडखळत होत्या, असं सोनिया गांधी म्हणाल्य़ा. त्यानंतर भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या द्वारकामध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांचे वक्तव्य अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले. त्या ओडिशाच्या जंगलातील आदिवासी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदी ही त्यांची मातृभाषा नाही. त्या उडिया भाषा बोलतात. मातृभाषा नसूनही त्यांनी हिंदीत खूप चांगल्या पद्धतीने भाषण केलं आणि सगळ्यांना प्रेरित केले. मात्र, गांधी या राष्ट्रपतींना गरीब आणि थकलेल्या म्हणाल्या.
त्यांना आदिवासी मुलीचं बोलणं कंटाळवाणं वाटतं. हा देशातील १० कोटी आदिवासी बंधू-भगिनींचा अवमान आहे. काँग्रेसच्या या शाही कुटुंबाला तळागाळातून आलेले लोक आवडत नाहीत. गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोक पुढे जात आहेत, पण त्यांना पावलोपावली अपमानित केलं जातं. या लोकांना शिवीगाळ करणं, देशाची बदनामी करणं, अर्बन नक्षलवादाच्या गोष्टी करणं यांना अधिक चांगलं वाटतं. या लोकांपासून खूप सावध राहायला हवं, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.