(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Marathi Serial: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अलिकडेच तिने स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. विशेष म्हणजे, ईशाच्या एक्झिटनंतर अवघ्या महिनाभरात या मालिकेनेही प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल राहिलेल्या या मालिकेतून बाहेर पडण्यामागचं कारण काय, याबाबत आता ईशाने पहिल्यांदाच सविस्तर खुलासा केला आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “आपण कितीही काहीही झालं तरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माझं खाणं-पिणं, झोप सगळं व्यवस्थित असूनही रोज १४ ते १६ तास शूटिंग करणं माझ्यासाठी खूप अवघड होऊ लागलं होतं. त्यामुळे हे आता शक्य नाही, असं वाटू लागलं.”
तिने सांगितलं की, मालिकांमधून लोकप्रियता आणि आर्थिक स्थैर्य मिळतं, पण त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. “मला स्वतःसाठी थोडा वेळ हवा होता. माझ्यासाठी ही मालिका महत्त्वाची होती, पण आरोग्य त्याहून महत्त्वाचं होतं,” असं ती म्हणाली.
ईशाने यावेळी तिच्या प्रकृतीबद्दलही धक्कादायक खुलासा केला. “माझ्या डोळ्यांना इन्फेक्शन झालं होतं. डॉक्टरांनी मला सलग १० तास झोप घेण्याचा सल्ला दिला होता. दिवसभर पुरेसं पाणी पिणं, पित्त होऊ न देणं अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. मी इतकी मोठी स्टार नाही की दीपिका पादुकोणप्रमाणे फक्त आठ तास काम करण्याची अट ठेवू शकेन. त्यामुळे या परिस्थितीत काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं,” असं तिने स्पष्ट केलं.
याच काळात ती १२ दिवस आजारी होती आणि तिला सलाईनही लावावं लागलं होतं. ईशा म्हणाली, “माझ्या आधीच्या मालिकांमध्ये आणखी एक मुख्य अभिनेत्री असल्यामुळे शूटिंगचं नियोजन शक्य होतं. पण ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये तसं नव्हतं. त्यात सण, विशेष भाग आणि इतर कार्यक्रमांमुळे कामाचा ताण आणखी वाढत गेला.”
पहिलं वर्ष आनंदात गेलं, मात्र दुसरं वर्ष खूप कठीण ठरल्याचं सांगत ईशा म्हणाली, “माझं आणि निर्मात्यांचं दोघांचंही नुकसान होण्यापेक्षा मी मालिकेतून बाहेर पडणं योग्य वाटलं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.”
मालिका सोडण्यावरून होणाऱ्या टीकेलाही तिने उत्तर दिलं. “‘ईशा मालिका सोडते’ हेच जणू माझं ब्रीदवाक्य झालं आहे. अनेकजण टोमणे मारतात. पण प्रत्येक निर्णयामागे एक ठोस कारण असतं, हे लोकांना दिसत नाही,” असं ती म्हणाली.
यावेळी ईशाने तिच्या पहिल्या मालिकेतून बाहेर पडण्यामागचं कारणही सांगितलं. “त्या काळात माझ्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्या जवळ राहणं आणि आई-वडिलांची जबाबदारी सांभाळणं माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. अशा वेळी मुलगी म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक होतं,” असं भावूक वक्तव्य तिने केलं.
आरोग्य आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय असल्याचं स्पष्ट करत ईशाने मालिकेतून बाहेर पडण्यामागील सर्व कारणांचा अखेर खुलासा केला.






