सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : हृदय आणि मेंदू यांचे आरोग्य एकमेकांशी अतूटपणे जोडलेले असतानाही आपल्या देशात या महत्त्वाच्या नात्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मेंदूला आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि ग्लुकोजयुक्त रक्ताचा अखंड पुरवठा हृदयाद्वारे होत असतो. त्यामुळे हृदयाच्या कार्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होऊ शकतो. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास इस्केमिक स्ट्रोक (रक्तपुरवठा बंद होणे), तर रक्तदाब अनियंत्रित राहिल्यास मेंदूतील रक्तस्राव (हॅमरेजिक स्ट्रोक) होण्याचा धोका वाढतो.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील न्यूरोसायन्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक व न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले एलडीएल कोलेस्टेरॉल, धूम्रपान, स्थूलता आणि व्यायामाचा अभाव हे जोखीम घटक हृदय आणि मेंदू दोघांसाठीही समानपणे धोकादायक आहेत. “जागतिक स्तरावर ५० टक्क्यांहून अधिक स्ट्रोक प्रकरणांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे प्रमुख कारणीभूत घटक आहेत. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चिंतेची बाब म्हणजे पूर्वी ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक आढळणारे स्ट्रोकचे प्रमाण आता ३० ते ४० वयोगटातही वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, तणाव, अयोग्य आहार, झोपेचा अभाव आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार आणि त्यासोबत मेंदूविकारांचे प्रमाण वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, हृदयाचे आरोग्य बिघडल्यास दीर्घकाळ मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ‘व्हॅस्क्युलर डिमेन्शिया’सारखी अवस्था उद्भवू शकते. यात स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याचा वेग मंदावणे, निर्णयक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे हळूहळू वाढत असल्याने अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात त्याकडे दुर्लक्ष होते.
स्ट्रोकची लक्षणे वेळेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा मुंग्या येणे, चेहरा वाकडा होणे, बोलण्यात अडचण येणे, शब्द उच्चारता न येणे, अचानक चक्कर येणे, तोल जाणे किंवा शुद्ध हरपणे ही धोक्याची घंटा मानली जाते. अशी लक्षणे दिसताच ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ रुग्णालयात दाखल करणे जीव वाचवण्यासाठी आणि कायमस्वरूपी अपंगत्व टाळण्यासाठी अत्यावश्यक आहे.
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नियमित रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाइल चाचण्या, संतुलित व कमी मीठ-तेलयुक्त आहार, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम, तणाव नियंत्रण, पुरेशी झोप आणि धूम्रपान व मद्यपान टाळणे या सवयी अंगीकारल्यास हृदय व मेंदूचे आरोग्य दीर्घकाळ सुरक्षित राहू शकते. तसेच व्हिटॅमिन B12 आणि D3 यांसारख्या पोषक घटकांची पातळी योग्य राखणेही महत्त्वाचे आहे.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक आणि न्यूरोव्हॅस्क्युलर आजारांवर प्रगत उपचार सुविधा उपलब्ध आहेत. एंडोव्हॅस्क्युलर प्रक्रिया, थ्रोम्बेक्टॉमीद्वारे रक्तातील गाठी काढणे, अडथळित रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट बसविणे, ब्रेन नेव्हिगेशन प्रणाली, इंट्राऑपरेटिव्ह आयसीजी इमेजिंग तसेच अवेक ब्रेन सर्जरीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित आणि परिणामकारक होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
हृदय आणि मेंदू या दोन्ही अवयवांचे आरोग्य वेगळे न पाहता एकत्रित दृष्टीकोनातून तपासणी व उपचार करण्याची गरज असून, आरोग्याबाबत सजग राहणे हीच स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांपासून बचावाची गुरुकिल्ली आहे, असा संदेश तज्ज्ञांनी दिला.






