अनेक हिंदू सणवार आणि रितीरिवाजांवर गदा आली होती याचं कारण म्हणजे परकीय आक्रमणं. मुघलांच्या सत्तेचा विळखा इतका वाढत गेला होता की, यामुळे हिंदूंना कोणतेच सण साजरे करता येत नव्हते. मात्र शिवरायांच्या स्वराज्यात मुघलांपासून रयतेला अभय होतं. शिवरायांच्या काळात दिवाळी दसरा प्रमाणेच होळीच्या सणाला मोठं महत्व होतं. खरं तर होळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने होते पण प्रत्येक ठिकाणच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात होळीच्य़ा याच परंपरेला शौर्याचा देखील इतिहास आहे. शिवरायांच्या काळात एक परंपरा सुरु झाली होती. धगधगत्या आगीतून नारळ बाहेर काढणं. वरवर पाहायला गेलं तर एक मनोरंजन किंवा साहसी खेळ म्हणून पाहिलं जातं. पण यामागे देखील शिवरायांची दूरदृष्टी देखील होती.
होळीतून नारळ बाहेर काढणं तसं पाहायला गेलं तर एक निमित्त असायचं. या साहसी खेळामुळे स्वराज्यातील मावळ्य़ांना हेरण्याचं काम शिवराय करत असे. ज्या मावळ्याने निर्भयपणे आगीत हात घालून तो नारळ बाहेर काढला, त्याला विशेष सन्मान दिला जाई. ही केवळ धार्मिक परंपरा नव्हती; तर सैनिकांच्या धाडस, सहनशक्ती आणि आत्मविश्वासाची परीक्षा होती.महाराजांच्या सैन्यातील मावळे पराक्रमी आणि निष्ठावान होते. होळीच्या दिवशी अशा धाडसी कृतीतून कोण खऱ्या अर्थाने रणांगणात उतरायला सक्षम आहे, याची चाचणी घेतली जाई. जो मावळा आगीतून नारळ काढायचा, त्याची निवड विशेष मोहिमांसाठी केली जाई आणि त्याला बक्षीसही दिलं जाई.रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला अशा किल्ल्यांवर होळी उत्साहात साजरी होत असे. ढोल-ताशांचा गजर, शस्त्रपूजा आणि रणगर्जना यामुळे वातावरण भारलेलं असे. सणासोबतच स्वराज्यरक्षणाची शपथ देखील घेतली जाई.
ही परंपरा दाखवते की स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे किती कटिबद्ध होते. सण-उत्सवांनाही शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची जोड देऊन महाराजांनी समाजात धैर्य, शिस्त आणि एकजूट निर्माण केली.होळीचा हा इतिहास आजही आपल्याला सांगतो की, सण फक्त आनंदासाठी नसतात; ते संस्कार, शौर्य आणि सामूहिक बळ वाढवण्यासाठीही असतात.






