नवी मुंबई : शेती उत्पदनात गुंतवणूक करा महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत अशी आकर्षक जाहिरात करीत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार करीत संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत एपीएमसी पोलीस तपास करीत होते. अखेर पोलिसांनी वेगात तपासचक्र राबवत तीन जणांना अटक केली तर एकाचा शोध सुरू आहे.
नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव सचिन भिसे असे यातील आरोपींची नावे असून यापैकी मुख्य आरोपी पार्टे आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकाच शोध सुरु आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यापूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे. नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम हि फर्म करते असे सर्वत्र भासवले जात होते.
याशिवाय पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालक हि आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा. जेवढी गुंतवणूक त्याच्या पाच टक्के दर महिन्यात परत मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी मिळणार असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते. हा व्यवहार पारदर्शक आहे हे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉजिट बॉण्ड गुंतवणूक दारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरु होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतात. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अनेकांना पटली.
अखेर याबाबत काही दिवसांपूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूक दराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथकाने अगोदर सर्व प्रकराची शहानिशा करत गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.
सदर गुन्ह्याची व्याप्ती ही जास्त असल्याने व यातील आरोपी बऱ्याच वेळा परदेशवारी करत असल्याने त्यांना अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पोलीस हवा भगत, बोराटे, वाटकर, काळे यांच्या पथकाने आरोपी यांना 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक हे करीत आहेत.