फोटो सौजन्य- MIDC
राज्यातील प्रकल्पांना सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात गुतंवणूक होणार असून रोजगारनिर्मितीमध्येही भर पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) क्षेत्रामध्ये तब्बल 29 हजार 550 कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता दिली. या गुंतवणूकीमुळे तब्बल ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित हे गुंतवणूक प्रकल्प हे सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत.
मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेला सिलीकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रत्नागिरीतील वाटद आणि झाडगाव एमआयडीसी मध्ये होणार आह. या प्रकल्पामध्ये 19 हजार 550 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पातून तब्बल 33 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
यातील दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आहे. राज्यातील हा पहिलाच एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये कंपनीकडून 10 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे 4500 रोजगार निर्मिती होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे.