मराठा आंदोलनात ‘कोट्यवधींचा खेळ’? जुने सहकारी बारस्कर यांची ED आणि आयकर विभागाकडे तक्रार
पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर यांनी स्पष्ट केले की, “माझा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला अजिबात विरोध नाही. त्यांनी आपले उपोषण खुशाल करावे. मात्र, या पवित्र आंदोलनाचा आडोसा घेऊन नेमका कुणाला फायदा झाला, हे मराठा समाजासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.”
बारस्कर यांनी पांडुरंग वसंतराव तारक यांच्यावर अंतरवाली सराटी आणि आसपासच्या परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला. “पूर्वी अत्यंत सामान्य परिस्थितीत असलेली ही व्यक्ती अल्पावधीतच एवढी श्रीमंत कशी झाली? एवढा पैसा आला कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनाच्या प्रभावाचा वापर करून संजय कटारे यांच्यावरील अवैध वाळू उपसा प्रकरणातील तब्बल ५ कोटी रुपयांचा महसूल दंड माफ करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप बारस्कर यांनी केला. या संदर्भात आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
या टोळीमध्ये गंगाधर काळकुटे यांचाही समावेश असल्याचा आरोप करत बारस्कर यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि वाळू व्यवसायातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अजय महाराज बारस्कर यांनी दावा केला आहे की, या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आणि कथित बेनामी मालमत्तांची सविस्तर तक्रार त्यांनी ED आणि आयकर विभागाकडे पाठवली आहे. आंदोलनाच्या नावाखाली गोळा झालेला पैसा आणि अचानक वाढलेली मालमत्ता यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या संवेदनशील लढ्याला बदनाम करून स्वतःचे खिसे भरणारी एक टोळी सक्रिय असल्याचा आरोप आता जरांगे यांच्याच जुन्या सहकाऱ्याने केल्यामुळे, आगामी काळात यावरून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.






