वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : वाई: “आजची नवी मुलं म्हणतात की मला नवा उद्योग करायचा आहे, भांडवल आणि जागा द्या. पण खरं तर उद्योग करायला केवळ पैसा किंवा जागा लागत नाही, तर लागते ती प्रबळ जिद्द! निर्मिती ही सहजपणे होत नाही, ती संघर्ष आणि कष्टातूनच होते. या संघर्षाचा हसतखेळत सामना करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्यास ते निश्चितपणे यशस्वी उद्योजक बनून समाजाचे प्रश्न सोडवू शकतील,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि ‘थर्माकोल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे रामदास माने यांनी केले.
वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी पुणे सिनियर केंब्रिज कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, सी.ए. उदयभाई गुजर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव व पर्यवेक्षक श्री. श्रावण पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
हे देखील वाचा : जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
यावेळी बोलताना डॉ. प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, बदलत्या जगात नोकऱ्यांचे स्वरूप जरी अनिश्चित असले, तरी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून काम करणारी माणसेच टिकून राहणार आहेत. याबाबतीत रामदास माने हे विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत आदर्श आहेत. अध्यक्षीय भाषणात मदनदादा भोसले यांनी शिक्षण आणि शहाणपण यातील फरक स्पष्ट केला. “विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षित न होता ‘कळते’ होणे महत्त्वाचे आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि धाडसातूनच प्रगती साध्य होते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेसोबतच चारित्र्य, शिस्त आणि मूल्यांची जोड द्या,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तत्पूर्वी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असतानाच येथे ए.आय. (AI), मशरूम निर्मिती, स्पिरुलिना आणि फोटोग्राफी यांसारखे कोर्सेस सुरू करून उद्योजकतेचे धडे दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.पर्यवेक्षक व कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री. श्रावण पवार यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल, तर क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण यांनी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा अहवाल सादर केला.
हे देखील वाचा : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
या मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील पारितोषिके स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नयना भोसले, श्रीमती स्वप्नगंधा जाधव व श्री. सुमित वाघमारे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी सौ. शीतल माने यांनी मानले, तर कु. सलोनी सरतापे आणि गौरव वायदंडे यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाई नगरपालिकेतील विविध समित्यांचे सभापती, पुरस्कृत नगरसेवक तसेच संस्थेचे संचालक, सदस्य तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वाईतील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मान्यवर उपस्थित होते.शिस्तबद्धता आणि नव्या उमेदीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असा ठरला.






