Ashadhi Ekadashi 2026: ग्लोबल दिंडी' पंढरपूरच्या वाटेवर! युरोप ते पंढरी... २५ जुलैला दाखल होणार परदेशी वारी
आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आली असून वारकऱ्यांच्या सगळ्या दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या वाटेवर पोहोचल्या आहेत. सर्व वैष्णवांना त्या विटेवर उभा राहिलेल्या सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्याची आणि भेटण्याची आस लागली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात वारकऱ्यांची लगबग सुरू असतानाच, यंदा सातासमुद्रापार एक नवा इतिहास घडला आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल’ असा गजर करत लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्सवरून निघालेली पहिलीवहिली ‘ग्लोबल वारी’ आता ११ देशांचा प्रवास करून महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री, मठाधिपती, श्री क्षेत्र भगवानगड यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)
पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
६ जून रोजी लंडनमधून प्रस्थान झालेली ही दिंडी तब्बल ५० दिवसांचा प्रवास करून २५ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी थेट पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. पंढरपूर येथे विठोबाच्या चरणी लीन होण्यासाठी अवधा महाराष्ट्र लोटतो. हे नाते केवळ एका देव आणि भक्ताचे नाही, तर आई आणि लेकराच्या वात्सल्याचे, सखा आणि सोबत्याच्या जिव्हाळ्याचे आणि गुरु-शिष्याच्या अद्वैत भावाचे आहे. पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल किंवा विठूमाउली आणि त्याच्या चरणांची आस धरून निघालेला वारकरी यांच्यातील हे नाते म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे. हे नाते शतकानुशतके संत परंपरेने जपले, वारीच्या अविचल प्रवाहाने अधिक घट्ट केले आणि काळाच्या ओघात त्याचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले.(फोटो सौजन्य – istock)
१७ व्या शतकात संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. यामुळे वारीला एक अत्यंत संघटित आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले. आज आपण पाहतो तो ‘पालखी सोहळा’ हा याच परंपरेचा विस्तार आहे.
वारक-यासाठी विठ्ठल हा केवळ दगडी मूर्तीत बंदिस्त देव नाही, तर तो सगुण, साकार, बोलणारा आणि ऐकणारा ‘विठूमाऊली’ आहे. तोच त्यांचा मायबाप, सखा-सोबती आणि संकटकाळी धावून येणारा त्राता आहे. हे नाते समतेवर आधारलेले आहे. येथे कोणताही जातीभेद, वर्णभेद किंवा लिंगभेद नाही. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ म्हणत, सर्व वारकरी एकाच विठ्ठलाची लेकरे म्हणून एकमेकांना ‘माऊली’ संबोधतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ इतकी तीव्र असते की, वारकरी शेकडो मैल चालत, ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता पंढरीची वाट चालतात. ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम’ हा एकच ध्यास त्यांच्या मनात असतो. हे नाते मागण्यांचे नाही, तर समर्पणाचे आहे. वारकरी विठ्ठलाकडे सांसारिक सुखे मागत नाही, तर ‘जन्मोजन्मी तुझा दास’ होण्याची आस धरतो. त्याच्यासाठी विठ्ठलाचे केवळ दर्शन हेच मोक्षसुख आहे. कमरेवर हात ठेवून, भक्ताची वाट पाहणारा हा देव, त्याच्या लेकरांच्या हाकेला ‘ओ’ देण्यासाठी सदैव तत्पर असतो, हा अतूट विश्वासच या नात्याचा मूळ आधार आहे.
प्रस्थान ६ जून २०२६ (लंडन, युके)
आगमन : २० जुलै २०२६ (पंढरपूर, भारत)
एकूण प्रवास : ५० दिवस
मार्ग : लंडन ते पंढरपूर (११ देशांतून रस्ते मार्गाने)
सहभागी लंडन आणि युरोपमधील शेकडो अनिवासी भारतीय






