पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे (Photo Credit - X)
देशातील पर्वतीय आणि डोंगराळ भागांतील जलसुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी केंद्रीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने झऱ्यांची गणना करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील १५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी अशा नैसर्गिक झऱ्यांवर अवलंबून आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ही गणना पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्याला १२ नवीन जलस्त्रोत मिळाले आहेत.
जिल्ह्यातील चार प्रमुख तालुक्यांमध्ये या झऱ्यांचा शोध लागला आहे. त्याचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:
सिल्लोड तालुका (सर्वाधिक ५ झरे): वडाळी (२), बाळापूर (१), पालोड (१) आणि पिंपळदरी (१).
कन्नड तालुका: भिलदरी गावात २ ठिकाणी जिवंत झरे आढळले आहेत.
खुलताबाद तालुका: वेरुळ येथे २, तर ममनापूर आणि कनकशीळ येथे प्रत्येकी १ झरा सापडला आहे.
फुलंब्री तालुका: मारसावळी येथे १ झरा आढळून आला आहे.
डोंगराळ भागात असलेल्या अनेक वाड्या-वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा झरा हा एकमेव नैसर्गिक स्रोत असतो. ग्रामीण समुदायाची घरगुती पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या झऱ्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. आता प्रशासनाकडून या ठिकाणांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात या झऱ्यांचे संवर्धन आणि त्या परिसराचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचे नियोजन केले जात आहे.
वेरुळ आणि सिल्लोडसारख्या भागात आधीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. आता या नवीन जिवंत झऱ्यांच्या शोधामुळे ‘इको-टुरिझम’ला (निसर्ग पर्यटन) अधिक वाव मिळणार आहे. या झऱ्यांच्या परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.






