मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित (Photo Credit- X)
आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर विमान कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. नेत्यांनी विमान प्रवास करणे टाळणे सुरु केले आहे. दरम्यान, रविवारी पालकमंत्री शिरसाट यांच्या चारचाकी वाहनाचाही अपघात झाला. यात ते बालंबाल बचावले. यानंतर सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी खासगी विमान एजन्सीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले, हवाई सेवा देणाऱ्या एजन्सी आपल्या विमानांचे, हेलिकॉप्टर्सचे मेंटेनन्स करतात कि नाही यावर शंका आहे. रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टर्सचा होतो आहे. याला सोडायचे त्याला घ्यायचे, त्याला सोडायचे तिसऱ्याला घ्यायचे असे सुरु आहे. अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून अशा एजन्सीजवरही काही बंधने घालणे गरजेचे आहे. पायलटची क्षमता, विमानाची क्षमता तपासणी जात नाही. म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हवेत असताना काही हेलिकॉप्टरला काही झाले असते तर काय केले असते ? म्हणून अशा घटनांना आता गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. हेलिकॉप्टर बिघडल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. कोणाच्या जीवाशी खेळणं हे उचित नाही. हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला क्लिअरन्स दिले पाहिजे. मात्र, कागदोपत्री क्लिअरन्स देऊन हेलिकॉप्टर सोडले जाते, असा गंभीर आरोप मंत्री शिरसाट यांनी खासगी विमान एजन्सींवर केला.
सध्या काय घडतंय है प्रत्येक राजकारणी माणसाला माहित आहे. माणसं मरत आहेत मात्र पक्षावर अधिक चर्चा होत आहे. म्हणूनच यामागचे कारणे काय याची सविस्तर चौकशी होणं गरजेचे आहे. काही घडलं कि आपण चार दिवस हळहळ व्हक्त करायची आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. म्हणून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी याव्या चौकशीसाठी मागणी केली पाहिजे असेही मंत्री शिरसाट पुढे म्हणाले,
दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांनी आपले जिल्हा परिषद प्रचारदौरे रद्द केले आहेत. दौऱ्यासाठी विमानांचा वापर करावा लागतो. सध्या होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे रद्द केले का, अशी चर्चाही सर्वसामान्य जनतेत ऐकायला मिळत आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विमान प्रवासाची भीती व्यक्त केली आहे.






