Chief Minister Devendra Fadnavis Announces That Solar Energy Will Be Used In All Government Offices
सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यापुढे सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर उर्जेचा वापर केले जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर उर्जाचा वापर केला जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा (फोटो - सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
पुणे : राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. निसर्गाच्या बचतीसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे , खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे , आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दीष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजचे देयक शून्यावर यावे असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा १०० टक्के निर्माण करणारी, महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात, महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या २ वर्षात देशभरात ४ लाख कृषी पंप बसाविण्यात आले असतांना राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देत ५ लाख सौर कृषीपंप बसविले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून १६ हजार मेगा वॉट क्षमतेचे फिडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तीत करण्यात येणार आहेत. त्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. विभाजीत पद्धतीने असलेला, आशियातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. एकूणच सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रातही राज्याने भरारी घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले.
Web Title: Chief minister devendra fadnavis announces that solar energy will be used in all government offices