GBS च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन 'अॅक्टिव्ह मोड'वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु (Photo : iStock)
पुणे : शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या 144 पाण्याच्या टाक्यांपैकी 52 टाक्यांची स्वच्छता केली गेली. अशुद्ध पाण्यामुळे उद्भवलेले जीबीएस आजाराचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तर जीबीएसबाधित क्षेत्रातील वीसहून अधिक टाक्या अद्याप अस्वच्छ आहेत.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शहरात जीबीएस आजाराचे संकट निर्माण झाले. अद्याप हे संकट पूर्णपणे दूर झाले नाही. जीबीएस आजार हा अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जीबीएसबाधित क्षेत्र असलेल्या सिंहगड रस्ता भागातील उपनगरातील पाणी पुरवठा यंत्रणेची माहिती घेतली.
यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करणारे, तसेच आरओप्लांटमधून केला जाणारा पाणी पुरवठा यांच्यासाठी नियमावली तयार केली. त्याचवेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता.
संपूर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु
केवळ जीबीएसबाधित क्षेत्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्याच नाही तर संपूर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ टाक्या असून, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तर बाधित क्षेत्रात ४४ पाण्याच्या टाक्या असून, यापैकी २४ टाक्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु असल्याने नागरिकांना पाणी काळजीपूर्वक वापरावे लागणार आहे.
दरम्यान, शहराच्या उपनगरांत आरओ प्लांट व्यावसायिकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आरओ प्लांटमधून होणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली होती. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही आरओ प्लांट पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली गेली होती. ते पुन्हा बंद केले गेले असून, नव्याने बारा जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी चार जणांना आरओ प्लांट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आठ जणांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे अर्ज नामंजूर केले आहेत.
बाधित भागासाठी क्लोरीन प्लांट
बाधित क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी चार क्लोरीन प्लांट उभे केले जाणार आहे. त्यापैकी नांदेड गाव येथील विहीर आणि बारंगणे मळा येथील विहीर येथे प्लांट बसविले आहे. तसेच खडकवासला आणि धायरी येथील टॅंकर पॉईंट येथे क्लोरीन प्लांट बसविले जाणार आहे. यासाठी ९५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच वडगाव उड्डाणपुलाखालील रॉ वॉटरच्या लाईनमधून होणारा पाणी पुरवठा थांबविण्यात येईल. त्या लाईनला शुद्ध पाणी पुरवठ्याची वाहीनी जोडली जाणार आहे.