Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने गेल्या २५ वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. सौर पॅनल उत्पादक, इन्व्हर्टर निर्माते, स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि ईपीसी कंपन्यांना एकत्र आणून उद्योगविश्वासाठी सक्षम व्यासपीठ उभारल्याबद्दल त्यांनी मास्माचे अभिनंदन केले. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया’ या दृष्टिकोनाला या उद्योग संघटनेमुळे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात एशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवला जात असून यावर्षाअखेर १६ गिगाव्हेट सौर ऊर्जा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छ, शाश्वत आणि भविष्योन्मुख ऊर्जा व्यवस्थेकडे महाराष्ट्राने टाकलेले पाऊल जागतिक पर्यावरणीय उद्दिष्टांनाही पूरक ठरणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज, उद्योगांना परवडणाऱ्या दरात वीज आणि एमएसएमई क्षेत्राला ऊर्जा खर्चात बचत यासाठी सौर ऊर्जेचा विस्तार हा विकासाचा मुलाधार ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्य शासनाने सौर ऊर्जा धोरण, रूफटॉप सौर प्रोत्साहन योजना, पीएम सूर्यघर योजना, पीएम कुसुम योजना, सौर उद्याने, ऊर्जा साठवण प्रकल्प आणि ग्रीन एनर्जी कॉरिडॉर यांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेला गती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात उद्योगांसाठी ओपन ॲक्सेस सुलभ करणे, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणे, सौर ऊर्जा साठवण तंत्रज्ञान विकसित करणे आणि तरुणांसाठी ग्रीन जॉब्स निर्माण करणे यावर शासन विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली
ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मासमासारख्या उद्योग संघटनांची भूमिका धोरणात्मक भागीदार म्हणून अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेविका मंजुषा खेडेकर, स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, जर्मन इंडो इनोवेशन कॉरिडोर (GIIC) चे संस्थापक उपेंद्र बर्वे, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप खाडे आणि माजी अध्यक्ष शशिकांत वाकडे उपस्थित होते. मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६ ला नागरिक, ग्राहक, उद्योग प्रतिनिधी आणि उद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सौर उपकरणांच्या स्टॉल्सना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भेटी देत माहिती घेतली आणि खरेदीही केली.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनाने महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जा प्रवासाला नवी दिशा आणि नवे बळ दिल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. “उज्वल, हरित आणि ऊर्जा संपन्न भविष्यासाठी” शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशाचा समारोप केला.






