संग्रहित फोटो
मुंबई : भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून, दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेतील गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असे नाही. भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रचंड वाद आहेत, तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने हे सरकार पाच वर्ष कसे चालणार हा कुतुहलाचा प्रश्न आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेलाच गिळंकृत करण्याचा डाव भाजपाने आखला असून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, पण भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते शिंदेना कितपत दाद देतील हे पहावे लागेल, असे सपकाळ म्हणाले.
फलटणमधील महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण उघड होऊन २४ तास झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. असा असंवेदनशील व अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला याआधी कधी लाभला नाही, हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर जे आरोप होत आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. त्या महिला डॉक्टरने तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. सुसाईड नोटही गायब करतील म्हणून त्या महिला डॉक्टरने हातावर नोट लिहिली होती असेही सपकाळ म्हणाले.
संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार त्यांच्याच पक्षाचे आहे, मातृभूमी फाऊंडेशनची उच्चस्तरीय चौकशी करा किंवा एसआयटी बसवा आणि त्यात काही तथ्य असेल तर कठोर शिक्षा करा पण ते कांगावा करत असतील तर सार्वजनिक जिवनातून निवृत व्हावे असे आव्हान सपकाळ यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर आश्वासन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. मध्यतंरी अजित पवार यांनी आम्ही असे म्हटले नव्हते असे म्हणाताच त्यांचा जाहिरनामाच त्यांना दाखवला होता तरिही ते पुन्हा कांगावा करत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजपाची शैली अजित पवारांनी उचलली असून ‘वाण नाही पण गुण तरी लागला’, असेच म्हणावे लागेल, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.






