महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवाद व भांडवलशाही यांचा सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार युवकांमध्ये पोहोचवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केली.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात दिनांक 22 ते 25 एप्रिल 1965 या कालावधीत ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर व्याख्याने दिली होती. या व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला राज्यपाल राधाकृष्णन यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी, दीनदयाल शोध संस्थेचे सरचिटणीस अतुल जैन, विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या उपाध्याय यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले. तसेच सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्याला पुढे घेऊन जात आहेत. ग्रामीण भागात रस्ते, गरिबांना गॅस कनेक्शन, पेयजल या योजना त्याचाच परिपाक आहेत. कोरोना काळात पाश्चात्य देशांनी लस शोधली असती तर तिची किंमत जनतेच्या आवाक्यात राहिली नसती.
मात्र, भारताने संपूर्ण देशवासियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली आणि त्यापलीकडे जाऊन अनेक देशांना मोफत लस उपलब्ध करुन दिली. हा सर्वसमावेशक विचार पंतप्रधान मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडूनच अंगिकारला आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले. वास्तवाचे भान ठेवून अन्न वाया जाऊ देऊ नये, प्रत्येकाने धन अर्जन करावे परंतु अनावश्यक खर्च करू नये तसेच स्वतःसाठी न जगता इतरांसाठीही जगावे हा दीनदयाल उपाध्याय यांचा विचार स्वीकारला पाहिजे, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
हिरक महोत्सवात काय म्हणाले राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन?
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.
“संपूर्ण जग कोविडशी झुंजत होते, त्यावेळी…”; हिरक महोत्सवात काय म्हणाले राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
या कार्यक्रमामध्ये बोलताना आदरणीय राज्यपाल म्हणाले, “जेव्हा संपूर्ण जग कोविडशी झुंजत होते, त्यावेळी आपण प्रत्येक जण अतिशय आतुरतेने लस येण्याची वाट बघत होतो. जेव्हा लस तयार झाली, तेव्हा जगभरातील सर्वच मेडिकल कंपन्या त्या लसीचे पेटंट घेण्याच्या शर्यतीत लागल्या, जेणेकरून त्यातून पैसे कमावता येतील. पण त्या वेळी मोदीजींनी असे केले नाही. संपूर्ण भारताला आणि जगालाही मोदीजींनी लस पुरवली आणि आजही त्याची आठवण जग ठेवत आहे. मोदीजींना हा विचार कुठून आला, या बाबत चिंतन केल्यास त्याची मुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिकवणीत आढळतात. विकसित भारतासाठी आज प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणे महत्त्वाचे आहे.