धरण क्षेत्रात पावसाची उघडीप तरीही पुराचा धोका कायम; कोल्हापूरची परिस्थिती नेमकी काय? (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय झाला आहे. प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आहे. आसपासची शेतीदेखील पाण्यामध्ये गेली आहे.
या संगमाच्या परिसरात असलेली काही मंदिरदेखील आता पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा आणि वारणा धरणातून होत असलेला विसर्ग आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या 24 तासांत पंचगंगा नदी धोका पातळी गाठू शकते. यामुळे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरबाधित नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या भोगावती व पंचगंगा नदीत आलेला महापूर पाहता नदी गावा शेजारील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे फक्त दोन दरवाजे सुरू आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये येणारे पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी असल्याने भोगावती नदीची व पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता कमी झाली असली तरी पंचगंगा नदीने राजाराम बंधारे पातळी ४२.८ झाली असल्याने नदी धोका पातळी इशाराकडे जात आहे.
धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस व राधानगरी धरणाचे दोनच दरवाजे सुरू असल्याने भोगावती नदी काठच्या भागातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तरीही कोल्हापूरला जोडणारे अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.