महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट
नगरपालिका निवडणुकीनंतरचा हा महायुतीचा सलग विजय मानला जात असून, ग्रामीण भागात महायुतीला मिळालेला पाठिंबा विशेष लक्षणीय ठरला आहे. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि राज्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी सांगितले. आगामी काळात महायुतीची एकजूट अधिक बळकट करून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील भाजपाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून विविध विकास योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यामुळे पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकल्याने प्रशासन आणि विकास यामध्ये समन्वय साधत जलद निर्णयप्रक्रिया राबवता येणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, महायुतीकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






