एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाचे नियोजन, जनजागृती आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समितीची एकमताने घोषणा करण्यात आली. तसेच २७ जुलै रोजी ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी मोर्चाच्या तारखेवरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
समितीमध्ये राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, नितीन शेरखाने, कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, विद्यानंद बनसोडे, ॲड. साबने, राजाभाऊ राऊत, सतपाल बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, ॲड. गणपती कांबळे, हरिश डावरे, डी. जी. होसलमल, भाई फुलचंद गायकवाड, बंडूभाऊ बनसोडे, अरुणभाऊ बनसोडे, शांतीनाथ शेरखाने, आनंद पांडागळे, ॲड. के. टी. गायकवाड, एस. के. चेले, भालचंद्र कठारे, अनिल हजारे, सुनील गायकवाड, मनीष सोनकवडे, राजेंद्र निकाळजे, काका भंडारे, महादेव वाघमारे, विकास बनसोडे, धनराज सोनकवडे, सुनील वाघमारे, फकीरा सूरवसे, कुंदन वाघमारे, किशोर वाघमारे, बाबा मस्के, दादा सरवदे, राजश्री कदम आणि विजय बनसोडे यांचा समावेश करण्यात आला.
बैठकीत एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभर जनजागृती अभियान राबविणे, विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क
यावेळी २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ५९ अनुसूचित जातींतील नागरिक, सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी आणि संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. प्रसिद्धी व जनसंपर्काची जबाबदारी राजाभाऊ राऊत, सोमनाथ गायकवाड, मुन्ना ओव्हाळ आणि कुंदन वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आली.
दरम्यान, बैठकीतच मोर्चाच्या तारखेबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याची माहिती मिळाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा व्हावा, अशी अनेक कार्यकर्त्यांची भूमिका होती. २७ जुलै रोजी त्यांचा सोलापूर येथे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने, २८ जुलै रोजी धाराशिवमध्ये मोर्चा आयोजित करावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे समजते.
मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका
मात्र, काही पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्वनियोजित २७ जुलै हीच तारीख कायम ठेवण्यावर ठाम असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय होतो, याकडे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजासह संविधानप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.






