'आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?' चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी
धाराशिव : विधानसभा पावसाळी अधिवेशनात धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. तुळजापूर शहरात चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा आरोप करत, “हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड झाली का?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ७ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्राद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव काही चिनी कंपन्यांच्या सीसीटीव्ही प्रणालींवर निर्बंध घातले आहेत. तसेच STQC मान्यताप्राप्त कंपन्यांचेच कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुळजापूर शहरातील तब्बल ६७ ठिकाणी ‘युनिव्हियू’ (Uniview) कंपनीचे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राच्या कोट्यवधी भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. गृह विभागाच्या अखत्यारीत हे काम होत असताना केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष का करण्यात आले?” असा सवाल त्यांनी सरकारला केला.
Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा …
इतिहासाचा दाखला देताना त्यांनी १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी तुळजाभवानीच्या मूर्तीचे संरक्षण करणाऱ्या स्थानिक पुजारी व तुळजापूरकरांच्या शौर्याची आठवण करून दिली. “त्या काळात देवीचे रक्षण झाले; मात्र आज हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळातच मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचाही उल्लेख करत त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चिनी कंपनीच्या सर्व्हरद्वारे संवेदनशील माहिती परदेशात जाण्याचा धोका असल्याचा दावा करत, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहातून केली.
दरम्यान, राज्यातील विविध लोकहिताच्या प्रश्नांसह धाराशिव जिल्ह्यातील ज्वलंत समस्याही आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने मांडल्या असून, जनतेच्या प्रश्नांना सभागृहात प्रभावीपणे वाचा फोडत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
Exclusive: ‘आई तुळजाभवानी‘च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत …
तुळजापूरातील चिनी सीसीटीव्ही प्रकरणाची एसआयटी चौकशी.
केंद्र सरकारच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणी केले, याची चौकशी.
जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई.
तुळजाभवानी मंदिर परिसरात केवळ मान्यताप्राप्त व सुरक्षित सीसीटीव्ही प्रणालीच वापरण्याची अंमलबजावणी.






