Devendra Fadnavis News: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून आयटी पार्कपर्यंत....; सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन
यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या अध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकत त्यांनी पंढरपूरला देशभरातून भाविक येत असल्याचे सांगितले. “केवळ पंढरपूर नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणारा विकास करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा प्रकल्प राबवणार असून, लवकरच आयटी पार्क सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती देताना, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, येत्या वर्षभरात ते महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, आयटी क्षेत्राच्या दृष्टीने सोलापूरला चालना देण्यासाठी आयटी पार्क उभारण्याचा निर्णय केवळ घोषणेत न ठेवता त्यासाठी फेब्रुवारीमध्ये जमीनही उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी लवकरच आयटी पार्क सुरू करून स्थानिक तरुणांना याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ,” अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
याशिवाय, सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबवून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उड्डाणपूल प्रकल्पांबाबत केंद्र स्तरावर अडचणी असल्यास १५ दिवसांत बैठक घेऊन त्या सोडवू, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याचा उल्लेख करत, नाईट लँडिंग सुविधा आणि मुंबईसाठी सोयीस्कर वेळेत उड्डाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नवी मुंबई विमानतळावर ऑपरेटरला आवश्यक स्लॉट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देताना, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय दहापट वाढेल. अन्यथा तुम्ही माझं नाव बदला,” असे ठाम विधान त्यांनी केले.
कॉरिडॉरसाठी प्रभावित होणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला, पर्यायी दुकाने किंवा विशेष पॅकेज दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सध्या सुविधा अपुऱ्या असल्याने हा प्रकल्प आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, उजनी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही महाराष्ट्राची अध्यात्मिक शक्ती असल्याचे सांगत या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.






