कोरेगावच्या राजकारणात खळबळ!
जगदाळे यांनी स्पष्ट केले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी पक्षांतर्गत जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. त्या प्रयत्नांमुळेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आणि त्यातूनच महेश शिंदे यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.
ते पुढे म्हणाले की, “खटाव, कोरेगाव आणि सातारा या भागात फिरताना आम्ही वास्तव परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती. मात्र सध्या सुरू असलेली चर्चा ही त्या वास्तवाशी सुसंगत नाही.” २०२९ च्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सूचक इशारा दिला की, “पक्षाने जो निर्णय घेईल त्यानुसार काम करावे लागेल,” असे सांगितले जात असले तरी सध्याच्या घडीला आमदार महेश शिंदे यांचे राजकीय पारडे जड असल्याचेही त्यांनी मान्य केले.
गावागावात शिंदे यांचा संपर्क मजबूत असल्याचे नमूद करत जगदाळे म्हणाले, “१२ हजार मतदार असलेल्या गावातही ते कौटुंबिक जिव्हाळा टिकवून ठेवतात.” मात्र याचवेळी त्यांनी वरिष्ठांकडून स्थानिक पातळीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “निवडणुका झाल्या, पण त्यामधील वास्तव वेगळेच होते.”
आपली भूमिका स्पष्ट करत जगदाळे म्हणाले, “माझा कोणावरही वैयक्तिक आरोप नाही आणि मला कोणत्याही पदाची अपेक्षाही नाही. मात्र लोकांसमोर खरी परिस्थिती मांडणे हे आमचे कर्तव्य आहे.” या वक्तव्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






