संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या हत्येप्रकरणानंतर वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले. आता या हत्येप्रकरणी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
हेदेखील वाचा : संतोष देशमुखांपासून खोक्याभाईपर्यंत, परळीत नेमकं काय घडतयं? अजय मुंडेंनी स्पष्टचं सांगितलं
सध्या न्यायलयीन, एसआयटी आणि सीआयडी अशी त्रिकोणी चौकशी सुरु आहे. तर एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातच सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. यामधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले आहे. तर हत्येवेळीचे जे फोटो दोषारोपपत्रातून समोर आले आहेत, त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता या हत्येप्रकरणी केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.
कृष्णा आंधळे अद्यापही फरारच
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता तीन महिने होत आहेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करत आहेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र, देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत आहेत, तरी आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळे बेपत्ता झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.