हिगोली शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनशून्य कारभार दिसून येत आहे (फोटो - सोशल मीडिया)
मकरंद बांगर : हिंगोली : हिंगोली शहर सध्या अक्षरशः वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि जेष्ठांना रस्त्यावर चालताना आणि रस्ता ओलांडताना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. (Hingoli News) शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनशून्य कारभार यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रश्न असा आहे की, हे सर्व रोज दिसत असताना प्रशासनाला नेमके कधी जाग येणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. (Traffic News)
गांधी चौक – बाजारपेठ की पार्किंग झोन ?
गांधी चौक ही शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असताना येथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. भाजी मंडी, फळविक्रेते, दुकाने, लॉज आणि रुग्णालये याच ठिकाणी असल्याने नागरिकांची गर्दी वाढते. मात्र पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना वाहने रस्त्याच्या मधोमध लावली जातात. ही परिस्थिती पाहून गांधी चौक बाजारपेठ आहे की पार्किंग झोन, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
मंडईतील अराजकता
भाजी मंडी परिसरात दररोज तासनतास वाहतूक ठप्प होते. फळविक्रेते रस्त्याच्या मधोमध गाड्या लावतात, वाहनचालक मनमानी पार्किंग करतात आणि यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुठेच दिसत नाही.
संकट डोळ्यासमोर
अकोला बायपासकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल आणि नरसी फाट्याकडे जाणारा कयाधू नदीवरील पूल यांची मुदत संपत आली आहे. आजच नियोजन झाले नाही. तर उद्या मोठा प्रश्न निर्माण होणार हे स्पष्ट आहे नागरिक त्रस्त दररोज होणारी कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढते अपघात आणि मानसिक त्रास-याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन, वाहतूक पोलीस, नगरपालिका आणि संबंधित विभाग यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी ठोस निर्णय घ्यावे, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे देखील वाचा : Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक
वाहतूक नियंत्रण नाही
या संपूर्ण परिसरात पोलिसांचा तळ असतानाही वाहतूक शाखेचा कर्मचारी क्वचितच दिसतो. नियम मोडणा-यांवर कारवाई का होत नाही? की नियम फक्त कागदावरच आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सिग्नल व्यवस्था बसवली, पण कधीच चालू नाही !
जिल्हा निर्मितीनंतर सिग्नल व्यवस्था सुरू होणे अपेक्षित होते. सिग्नल बसवले गेले, निधी खर्च झाला; मात्र आजपर्यंत एकही सिग्नल प्रभावीपणे सुरू झालेला नाही. निधी पोलिसांनी द्यायचा की नगरपालिकेने या वादात वर्षे गेली, पण शहराची वाहतूक मात्र अडचणीतच राहिली.






