रस्त्यांवर रंबलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली
म्हसवड / महेश कांबळे : म्हसवड शहराला जोडल्या जाणाऱ्या सातारा-पंढरपूर या महामार्गासह सर्व अंतर्गत रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची मागणी केली. म्हसवड पालिकेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने रस्ते विकास मंडळाकडे ही मागणी केली. आता या मागणीला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या शिष्टमंडळाला रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने शहराला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर रम्बलर बसवून देण्याचे आश्वासन देत एकप्रकारे घोषणाच केली होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीच पाऊले संबंधित विभागाकडून उचलली गेली नसल्याने रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली की काय? असा प्रश्न सर्व म्हसवडकर जनतेला पडलेला आहे.
माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून म्हसवडची विशेष ओळख आहे. याच शहरात भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचे प्राचीन असे मंदिर आहे. याच शहरातून सातारा ते पंढरपूर असा राज्य महामार्गही गेला असून, याच महामार्गावर आजवर अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. तर अनेकजण अशा अपघातांमुळे कायमचे जायबंदी झालेले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठही याच शहरात असल्याने परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या गावांतील नागरिकांना याच म्हसवड शहरात यावे लागते. त्यामुळे शहराला अनेक छोट्या, मोठ्या गावांना जोडणारे रस्ते आहेत.
शहरातून जाणारा सातारा-पंढरपूर या राज्य महामार्गावर शहरात व शहराबाहेर पडताना कोठेही गतिरोधक नाही, याचा फटका अनेक सर्वसामान्यांना बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शहरातील राकेश तिवाटणे या व्यक्तीचा याच महामार्गावर अपघाती दुर्देवी मृत्यू झाला. त्यावेळी हळहळ व्यक्त होताना या महामार्गावर व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक उभारण्याची जोरदार मागणी म्हसवडकर नागरिकांतून व्यक्त करण्यात आली. तर राकेशचा मृत्यू रस्त्यावर गतिरोधक नसल्यानेच झाल्याचेच नागरिकांचे म्हणणे होते.
पीएमपीएमएल ठेकेदाराच्या फायद्यासाठी? नगरसेवकांचा उपरोधिक सवाल; प्रशासनावर जोरदार टीका
नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन पालिकेचे नगरसेवक व सर्वसामान्य जनतेचे आधारवड असलेले विजय धट पुढे आले. त्यांनी याबाबत गंभीरता दाखवत पुढाकार घेत या महामार्गावर गतिरोधक बसवण्याबाबत पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करुन यापुढे अपघाती कोणाचाही बळी जाऊ नये, यासाठी इतर काही नगरसेवकांना सोबत घेत थेट पुणे येथील रस्ते विकास मंडळाचे विभागीय कार्यालय गाठले.
या मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आजवर सदर महामार्गावर कितीजणांचे अपघाती बळी गेले आहेत, किती जण कायमचे अपघाताने जायबंदी झाले आहेत, याचा पाढाच वाचला. धट यांची गतिरोधकाविषयची आक्रमक भूमिका उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी पाहून याबाबत आमचे खाते ही तुमच्या मताशी सहमत असल्याचे सांगत धट यांच्यासह गेलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.






