कर्जत/संतोष पेरणे : डोंगरपाडा येथे युनायटेड वे मुंबई कार्यान्वयित जल संजीवनी प्रकल्पांतर्गत रोपवाटिका व्यवसायाचा आणि उभी परसबाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना गांडुळ खत किट,फवारणी पंप यांचे वाटप करण्यात आले.तसेच घरगुती भाजीपाला तयार करण्यासाठी किचन गार्डन संकल्पना राबविण्यात सुरुवात झाली आहे.
युनायटेड वे मुंबई, अंधेरी (प.) संस्थेद्वारे कार्यान्वयित ‘जल संजीवनी’ प्रकल्प कर्जत तालुक्यात मृदा व जलसंधारण, ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून, पाथरज ग्रामपंचायतीमधील डोंगरपाडा येथे गावकऱ्यांना विशेषतः महिलांना पोषणयुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘उभी परसबाग’ (व्हर्टिकल किचन गार्डन) आणि महिला सक्षमीकरणासाठी ‘रोपवाटिका’ व्यवसायाचे औपचारिक उद्घाटन डोंगरपाडा गावात करण्यात आले.यावेळी कृषी पर्यवेक्षक अनिल रूपनवर,भाणवसे,जिल्हा परिषद शाळेचे स्वाती अवरगंडे, युनायटेड वे या संस्थेचे मंगेश बोपचे आदी उपस्थित होते.कमी पाणी आणि कमी श्रमात घराच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवता यावा, या उद्देशाने डोंगरपाडा गावातील २७ महिला बचत गट सदस्य असणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमात प्राधान्य देण्यात आले आहे. या कुटुंबांना निम पेंड, ट्रायकोडर्मा, उसाची मळी यांसारखी सेंद्रिय खते तसेच विविध भाजीपाल्यांचे बियाणे किट आणि रोपे वितरित करण्यात आली होती.या कार्यक्रमात सध्या या भाजीपाल्याची उगवण उत्तम झाली असून या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे महिलांना घरच्या घरी सकस आहार उपलब्ध होणार आहे.या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी खांडस बचत गटाच्या अरुणा ऐनकर यांनी आपल्या गटाची भरभराट कशी झाली याबद्दल माहिती दिली. डोंगरपाडाचे माजी उप सरपंच अतुल लोहकरे यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या मृदा आणि जलसंधारण कार्य आणि शेतीविषयक राबविलेले उपक्रमबद्दल माहिती दिली.राजेश्री तिटकरे यांनी उपक्रम निवड आणि पुढील वाटचाल बद्दल थोडक्यात सांगितले, तुंगी येथील ग्रामस्थ काळूराम पारधी यांनी संस्थेने तुंगी गावात राबवीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती देऊन असेच लोक उपयोगी कार्य निरंतर सुरु असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल रूपनवर यांनी उपस्थितांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. सहाय्यक कृषी अधिकारी नितीन भानवसे यांनी सदर महिला बचत गटांना कृषीविभागद्वारे मार्गदर्शन करून कलम बांधणी पासून ते मार्केटिंग तसेच शासकीय लायसन्स मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून देणार असल्याची हमी दिली.रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपाडा येथील शिक्षिका स्वाती अवरगंडे यांनी संस्थेने शाळेसाठी केलेल्या विविध उपक्रम जसेकी रंगरंगोटी, पाणी फिल्टर, सौर प्रकल्प उपक्रमाचे कौतुक करून केले.