सोमवार, मंगळवार आणि बुधवार दरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः घाटमाथा आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता असल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
20 आणि 21 तारखेला पावसाचा जोर वाढणार असून कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातही आजपासूनच वातावरणात बदल जाणवणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी पावसाचा जोर आणि क्षेत्र अधिक विस्तारणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह पुणे विभाग आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात विजांच्या तांडवासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती विभागातही वादळी पावसाचे संकेत आहेत. दरम्यान, 22 एप्रिलपासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
66 बाष्पयुक्त वारे आणि वाढत्या तापमानामुळे राज्यात 20 ते 22 एप्रिल अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि मराठवाड्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतक-यांनी काढणीचा शेतीमाल सुरक्षित ठेवावा. – माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ बळीराजा धास्तावला; काही पिके धोक्यात सध्या अनेक भागांत उन्हाळी पिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशातच वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. उभ्या पिकांसह काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.






