महापालिकेत पाणी टंचाई, पाणी अन् वाढीव बिल याचीच चर्चा राहिली.
शहरात गेले दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, काही भागात पाणीच पोहोचले नाही. परिणामी, काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला, पण बुधवारी सकाळीही अनेक भागात पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, नागरिकांचे फोन नगरसेवकांना आणि नगरसेवकांचे कॉल आयुक्तांना असा सिलसिला सुरू झाला. अगदी आयुक्तांकडून जल अभियंत्यांनाही कॉल केले.
दोनच टँकर सुरू असल्याने परिस्थिती बनली अवघड
दोनच टँकर सुरू असल्याने सर्वच भागात पाणीपुरवठा करणे अवघड बनले होते. तरीही आयुक्त के. मंजुलक्ष्मी या प्रश्नात लक्ष घालून होत्या. महापालिकेच्या सभागृहात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, विरोधी पक्ष नेत्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले. अर्ज भरून झाल्यानंतर ते सर्वजण आयुक्तांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेले. आयुक्तांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जायचे होते, पण तरीही त्यांनी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्याकडून पाणी प्रश्न ऐकून घेतला. एका नगरसेविकेने तर मॅडम सकाळपासून फोन सुरू असल्याचे सांगितले अन् टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली, जल अभियंत्याशी बोलून घ्या, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच आपण स्वतःही त्यांच्याशी बोलू, अशी ग्वाही देऊन त्या निघून गेल्या.






