(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि भावनांच्या गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या तिघी या चित्रपटाने प्रदर्शना आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ‘हास जराशी’ या पहिल्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता चित्रपटातील आणखी एक हळुवार आणि भावस्पर्शी गीत ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे खास गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, आई–मुलीच्या नात्याचा कोमल आणि अंतर्मुख प्रवास यातून उलगडणार आहे.
‘शारदा सरिता’ हे गाणे प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरेल याच शंकाच नाही. आईच्या मायेची सावली, तिची निःशब्द ताकद आणि मुलीच्या आयुष्यातील तिचे अविभाज्य स्थान या गीतातून अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन या गाण्याची खरी ताकद ठरतो.
प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गीताचे शब्द अत्यंत काव्यमय आणि अर्थपूर्ण आहेत. भावनांची सूक्ष्म जुळवाजुळव करत त्यांनी नात्यांचा प्रवाही अनुभव शब्दांतून उभा केला आहे. संगीतकार निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि सध्या चालीमुळे गाण्याला शांत, नदीसारखा वाहता भाव लाभला आहे. तर प्रियंका बर्वे यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे या गीताला अधिक उंची प्राप्त झाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर संगम साधणारे हे गाणे मनात हळुवारपणे घर करून राहील.
गीतकार जितेंद्र जोशी याबाद्दल म्हणाले, ‘शारदा सरिता’ लिहिताना त्यांनी मोठ्या, ठळक भावना मांडण्यापेक्षा मनाच्या खोलवर झिरपणाऱ्या भावनांना शब्द देण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातील नात्यांची ताकद, त्यातील स्वीकार आणि त्यांचा शांत प्रवाह शब्दांत पकडण्याची त्यांची इच्छा होती. नदीसारखे वाहणारे शब्द हीच या गीतामागील प्रमुख भावना असल्याचे ते सांगतात.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांच्या मते, ‘तिघी’ हा चित्रपट न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि नात्यांतील सूक्ष्म घालमेल टिपतो. ‘शारदा सरिता’ हे गाणे केवळ कथानकाचा भाग नसून, तो एक भावनिक अनुभव आहे. आई–मुलीच्या नात्यातील हळवी पण मजबूत वीण या गीतातून अधिक ठळक होते आणि त्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा त्यांचा विश्वास आहे.
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्यासह भारती आचरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. भावनांचा प्रवाह, नात्यांची गुंतागुंत आणि आई–मुलीच्या नात्याची हळवी जाणीव यामुळे ‘शारदा सरिता’ हे गाणे आणि ‘तिघी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, यात शंका नाही.






