वनविभागाकडे सक्षम अधिकारी, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव
स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोवस्त करावा, पिंजरे लावावेत तसेच चांदोली अभयारण्य परिसरात प्रभावी कुंपण उभारावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शिराळा वनविभागाकडे सक्षम अधिकारी, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव असल्याची टीका होत आहे. हल्ल्यांच्या घटना घडल्यानंतरच हालचाली केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वावर परिसरात तात्काळ पिंजरे लावण्यात यावेत : राहुलदादा महाडिक
येलूर परिसरातील परिस्थतीत्या पार्श्वभूमीवर वन विभाग व शासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक यांनी केली आहे. परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी राहुलदादा महाडिक यांची भेट घेऊन बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाबाबत निवेदन सादर केले. ग्रामस्थांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत महाडिक यांनी तातडीने वन विभाग, स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात्त तात्काळ पिंजरे लावावेत, रात्रीची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
शिराळा तालुक्यात ६०० हून अधिक बिबटे व पिलांचा वावर
शिराळा तालुक्यात सुमारे ६०० हून अधिक बिबटे व त्यांच्या पिलांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उसतोडीच्या हंगामात उसाच्या फडात लपून बसलेले बिबटे अचानक समोर येत असल्याने मजूर आणि शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी मानवी वस्तीजवळही बिबटे दिसून आल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच काही गावांमध्ये जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका बालकावर हल्ल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पशुपालकांच्या भरपाईसह शेतीपंपांना दिवसा वीज द्या
विबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकाना शासनाकडून त्वरित व भरीव भरपाई मिळवून देण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशील असल्याचे आश्वासन महाडिक यांनी ग्रामस्थांना दिले, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने येलूर कुंडलवार परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, अशी ठाम मागणी राहुलदादा महाडिक यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.






