कृषीप्रधान महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांचा जातोय जीव (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जातं. तसेच विरोधी पक्ष सातत्यानं सरकारवर शेतकऱ्यांसाठी काय केलं, अशा स्वरुपाच्या प्रश्नांची सरबत्ती करत असतो. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, गेल्या ५६ महिन्यांत म्हणजेच राज्यात दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे अंशतः खरे आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण इतर प्रदेशांपेक्षा जास्त असल्याची देखील माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे घटक आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मराठवाडा विभागात ९५२, अकोल्यात १६८, वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५ आणि अमरावती विभागात १,०६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत माहिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील बोलत होते.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान, छत्रपती संभाजीनगर भागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ७०७ जण मदत मिळण्यास पात्र होते आणि ४३३ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. बीड जिल्ह्यात १६७ प्रकरणांमध्ये मदत मंजूर करण्यात आली आणि १०८ प्रकरणांमध्ये आर्थिक मदत देण्यात आली.
अमरावती विभागात ४४१ प्रकरणांमध्ये शेतकरी मदतीसाठी पात्र होते आणि ३३२ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.