आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी
कल्याण-डोंबिवली शहराच्या जडणघडणीत, विकासात आणि या शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यात येथील मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाने आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी देऊन मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, अत्यंत खेदाची आणि संतापाची बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराच्या माहितीबाबत प्रकाशित केलेल्या पुस्तकातून या स्थानिक आगरी-कोळी समाजाचा इतिहास, संस्कृती, लोकपरंपरा आणि शहराच्या विकासातील त्यांचे योगदान जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. इथल्या मूळ भूमिपुत्रांचा हा घोर अपमान असून, यामुळे संपूर्ण आगरी-कोळी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांचा इतिहास पुसून टाकणारे आणि त्यांचा अपमान करणारे हे वादग्रस्त पुस्तक त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्याचे पुढील वितरण तत्काळ थांबवण्यात यावे.
या भागातील स्थानिक संस्कृतीला डावलून जाणीवपूर्वक हा अपमान करणाऱ्या संबंधित ‘पुस्तक निर्मिती समितीची’ सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आली.आगरी ग्रंथालय चळवळ’ ही संस्था गेली १६ वर्षे आगरी बोलीभाषा आणि आगरी-कोळी संस्कृतीच्या जतन व संवर्धनाचे अविरत आणि अभ्यासपूर्ण काम करत आहे. या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे केडीएमसीने इथल्या मूळ भूमिपुत्रांच्या सन्मानार्थ आगरी-कोळी संस्कृतीचा गौरवशाली इतिहास मांडणारे एक ‘विशेष पुस्तक’ नव्याने प्रकाशित करावे. जर या नवीन पुस्तकाच्या संकलनाचे व निर्मितीचे कार्य ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ या संस्थकडे सोपवले, तर अत्यंत जबाबदारीने, पुराव्यांसह आणि अभ्यासपूर्ण रीतीने हा इतिहास शब्दबद्ध करू. यामुळे इथल्या संस्कृतीचे योग्य दस्तावेजीकरण होईल आणि भूमिपुत्रांना खरा न्याय मिळेल अशी मागणी केली असल्याची माहिती साहित्यिक सर्वेश तरे यांनी दिली.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”






