आमदार सुनील शेळके रोजगार हमी योजनेची मुंबई बैठक पार पडली (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्याच्या उद्देशाने आज (दि. २१ मे) विधानभवन, मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण २५ आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या २६६ कामांचा समावेश असून त्यांचे अ, ब, क, ड अशा चार वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सिंचन विहिरी, फळबाग लागवड, पानंद व शिवरस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने करण्यात येतात.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बैठकीत महाराष्ट्र राज्यात योजनेअंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये सुरू असलेली, प्रलंबित असलेली व पूर्ण झालेल्या कामांची देयके यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्याने हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांची रूपरेषा ठरवण्यात आली.
योजनेच्या माध्यमातून विकासकामांसोबतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना रोजगाराच्या माध्यमातून लाभ मिळावा, हेच या समितीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा नियोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
योजना राबवताना येणाऱ्या अडचणी, निधीची कमतरता आणि इतर प्रश्न यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रलंबित देयके मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठरले. सदस्य आमदारांनी बैठकीत आपापल्या भागातील अडचणी आणि प्रश्न मांडले असता, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या बैठकीस समिती सदस्य आमदार शंकर मांडेकर, योगेश टिळेकर, अमोल जावळे, विनोद अग्रवाल, राजेश वानखेडे, शांताराम मोरे, हिकम्मत उढाण, काशिनाथ दाते, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक, बापूसाहेब पठारे, किरण सरनाईक, सुधाकर अडवाले यांच्यासह सचिव, आयुक्त, मिशन महासंचालक, सहाय्यक संचालक, उपसचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. सोलापूरमध्ये देखील राजकारण रंगले आहे. सोलापूरच्या राजकारणामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकींच्या तोंडावर त्यांनी घेतलेला निर्णय पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाची कास धरली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी मुंबई दौरा करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिद्धराम म्हेत्रे यांनी पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.