मराठी-अमराठी वाद चिघळणार; टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम, गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक
राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन संघटनेने संपाची घोषणा केली आहे. सोमवारी गोरेगाव पश्चिम येथील केशव गोरे मेमोरियल ट्रस्ट हॉलमध्ये टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालक व मालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल. दरम्यान, मराठी प्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे २०२६ पासून राज्यातील परवानाधारक ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ओला आणि उबरसारख्या अॅप-आधारित चालकांचाही समावेश आहे, प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालये टॅक्सी चालकांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहेत. ज्या चालकांना मराठी वाचता किंवा लिहिता येत नाही, त्याचे परवाने रद्द केले जातील.
पुणे आणि पिपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौ-यावर असलेले अमित ठाकरे म्हणाले, आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. ऑटी चालकांना काही आक्षेप असेल तर त्यानी आपापल्या राज्यात जावे. आता बाहेरचे लोक मुंबई बंद पाडणार का? आम्ही मराठी लोकांसोबत खंबीरपणे उभे आहोत.
मुंबई कशी बंद पडते ते पाहू. महाराष्ट्रात मराठीचा आदर झालाच पाहिजे, त्यांच्या संपाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. मराठी ऑटो चालक १२ तास गाडी चालवायला तयार आहेत. कट्टरता सहन केली जाणार नाही आणि त्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल.
आम्हीही मराठीचा आदर करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. या प्रकरणाला मराठी विरुद्ध गैर-मराठी असा वाद बनवू नये. रोजच्या कमाईसाठी कष्ट करणाऱ्या गरजू ऑटो-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणे योग्य नाही. त्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गट नेते संजय निरुपम यांनी दिली.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी हा अन्यायकारक निर्णय तात्काळ रद करावा, युनियनने सरकारला २८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. आम्ही मराठी भाषेचा आदर मान्य करती, पण परवाने आणि परवानगी रद्द करणे योग्य नाही. हा कामगार वर्गावर अन्याय आहे. आम्ही आज गोरेगावमध्ये ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक व मालकांची बैठक बोलावली आहे. भविष्यातील रणनीती तिथेच ठरवली जाईल,अशी प्रतिक्रिया ऑटो रिक्षा-टॅक्सीसेन यूनियन अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.






