(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुरादाबादमधील कुंदरकी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात इल्मा अफरोजचा जन्म झाला. वडिलांनी तिला साधेपणा आणि कष्टाचे धडे दिले याच्याच बळावर ती मोठी होत होती. पण जेव्हा इल्मा फक्त १४ वर्षांची होती, तेव्हा वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि १२ वर्षांचा मुलगा आणि इल्मा यांच्या दोघांच्या संगोपनाची जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली. त्या काळात इल्माने शेतात राबून कष्ट केलं. या सगळ्या संघर्षांवेळी कोणी त्या अधिकारी लेकीची कल्पनाही केली नसणार पण ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं.
सुरुवातीचा प्रवास शेतात पण नंतर उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं सोपं नव्हतं. या सगळ्या मागे होता तो त्या आईचा खंबीर पाठिंबा आणि तिचा संघर्ष. समाजातील जुन्या रूढी आणि संकुचित विचारांना बाजूला सारून इल्माच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला. ज्या समाजात मुलींच्या लग्नासाठी हुंड्याचे पैसे जमा केले जातात, तिथे इल्माच्या आईने आणि त्यांच्या लहान भावाने स्वतःच्या सुखाचा त्याग केला. त्यांनी आपली सर्व पुंजी आणि संसाधनं इल्माच्या उच्च शिक्षणावर खर्च केली. इल्मा आजही आपल्या आईला जगातील सर्वात धाडसी महिला मानते.
इल्माच्या बुद्धिमत्तेने तिला दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तिची निवड ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ मध्ये झाली, जिथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणांनंतर ती न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनमध्ये गेली. तिथे तिचं जीवन निवांत आणि आलिशान होतं. पण मॅनहट्टनची स्कायलाईन पाहताना तिला नेहमी गांधीजींचा तो संकल्प आठवायचातिला जाणवलं की, त्यांच्या शिक्षणाचा खरा फायदा आपल्या देशातील लोकांनाच झाला पाहिजे. त्यानंतर तिने परदेशातील सुख सोडून भारतात परतण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि स्वदेशींचं भलं करण्यासाठी ती भारतात परतली.
२०१७ मध्ये इल्मा अफरोजने यूपीएससी परीक्षेत २१७ वा रैंक मिळवला आणि IPS साठी निवड झाली. हिमाचल प्रदेश केडर मिळालं, परंतु तिचं ध्येय केवळ गुन्हेगारांना पकडणं नव्हतं. इल्माने आपल्या कुंदरकी गावात ‘होप’ (Hope) नावाचं नेटवर्क सुरू केलं आहे,. हे नेटवर्क वंचित आणि गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतं. वडिलांचं कॅन्सरमुळे निधन होण्यापासून आणि शेतात काम करण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आणि आजही ती प्रेरणा तरुणांच्या मनात जिवंत ठेवण्याचं काम त्या होपच्या माध्यमातून करत आहेत.






