म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता
मुंबईमध्ये आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. यामुळे सर्व सामान्य म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतात, मात्र यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत अवघे चार दिवस शिल्लक असून आतापर्यंत अनामत रकमेसह केवळ २४,८२१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी यंदाच्या लॉटरीत कमी घरे आणि किमती जास्त यामुळे सर्वसामान्यांनी म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद दिला आहे. म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी म्हाडाकडे लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मुंबई मंडळातर्फे मे २०२३ मध्ये ४०८३ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी, तर सप्टेंबर २०२४ मध्ये काढलेल्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १ लाख १३ हजार ८११ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते. २६४० घरांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ३९,९८६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ २४,८२१ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. इतकी कमी अर्ज संख्या पाहता अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र म्हाडा घरांच्या किमती कमी करणार का, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.(फोटो सौजन्य – istock)
लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत २९ लाख ३७हजार रुपये आहे, तर सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत ६ कोटी ८२ लाख रुपये आहे. लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ १४५ घरे उपलब्ध आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे असली, तरी त्याच्या किमती कोट्यवधींच्या घरात आहेत, वरळीत अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सदनिकेची किमत चक्क २ कोटी ९ लाख रुपये आहे. घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला असून कोणत्या योजनेत अर्ज भरायचा असा प्रश्न त्याना पडला आहे. त्यामुळे म्हाडाची घरे खरंच परवडणारी आहेत का, असे म्हणायची सर्वसामान्यांवर वेळ आली आहे. अल्प प्रतिसाद पाहता मंडळाला नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवल्याचेही सूत्रांनी सांगितले, मुदतवाढीबाबत मंगळवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सागितले.
१,१३,८११अर्जदारांनी अनामत रकमेसह सप्टेंबर २०२४ मध्ये काढलेल्या २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्ज केले होते.१,१९,२७८ अर्जदारांनी मुंबई मडळातर्फे में २०२३ मध्ये ४०८३ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज केले. ३९,९८६ २६४० घरांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत अर्ज प्राप्त झाले.-२४,८२१ अर्ज चार दिवस शिल्लक असून आतापर्यंत अनामत रकमेसह प्राप्त झाले.






