ई-फार्मसीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
भाईंदर : ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) ॲप्सच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि कथित नियमबाह्य औषध विक्रीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदर शहरातील औषध विक्रेत्यांनी आंदोलन छेडले. भाईंदर पश्चिम येथील एमटीएनएल कार्यालयापासून नगररचना विभागाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील अनेक औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत औषध विक्रेत्यांनी ई-फार्मसीविरोधात नाराजी व्यक्त केली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. दोलनकर्त्यांच्या मते, ई-फार्मसी कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे पारंपरिक मेडिकल स्टोअर्सच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
व्यवसायावर आर्थिक परिणाम: मोठ्या सवलतींमुळे ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत असून स्थानिक मेडिकल दुकानदारांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
असमान स्पर्धा: मोठ्या ई-कॉमर्स आणि ऑनलाइन फार्मसी कंपन्यांशी लहान दुकानदारांना स्पर्धा करणे कठीण जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बनावट किंवा चुकीच्या औषधांचा धोका: विना-प्रिस्क्रिप्शन औषध वितरण, बनावट औषधे किंवा चुकीचे औषध मिळण्याची शक्यता वाढत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
रुग्णांना वैयक्तिक मार्गदर्शनाचा अभाव : स्थानिक मेडिकल दुकानदार रुग्णांना औषधांबाबत आवश्यक माहिती देतात. ऑनलाइन सेवांमध्ये हा मानवी संवाद कमी होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
रोजगारावर परिणाम
पारंपरिक मेडिकल व्यवसाय घटल्यास स्थानिक पातळीवरील रोजगारांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयांशी संलग्नित आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही मेडिकल स्टोअर्सना बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ई-फार्मसीवर कठोर नियंत्रण आणावे आणि पारंपरिक औषध विक्रेत्यांचे हित जपावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केली.






